पुणे : ‘पर्यावरण संवर्धन करताना काही विशिष्ट घटकांकडेच लक्ष दिलं जातं, आपण वाघाच्या संवर्धनाबाबत गंभीर असतो, पण त्याच वेळेला माळढोक, रानम्हशी यासह जंगल आणि सागरामधील अनेक वनस्पती, जीव नष्ट होत आहेत याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. निसर्गातील सर्व घटकांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि वसुंधरा सन्मान पुरस्कार विजेते एम. के. रणजितसिंग यांनी व्यक्त केले.
१२ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर किर्लोस्कर कंपनीचे जॉईंट मॅनेजमेंट डायरेक्टर आर. आर. देशपांडे, किर्लोस्कर कंपनीचे अतुल किर्लोस्कर, अध्यक्ष माधव चंद्रचूड, निमंत्रक आरती किर्लोस्कर, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ग्रीन टीचर पुरस्कार डॉ. दीपक आपटे यांना व इको जर्नालिस्ट पुरस्कार पत्रकार आरती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रणजितसिंग म्हणाले, ‘संवर्धनाबाबत, पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र निर्माण व्हायला नको. हे सगळं जतन व्हायला हवं, हे लोकांना आतून वाटायला हवं. आपण आपलं घर स्वच्छ करतो आणि घरातला कचरा बाहेर टाकतो, या मानसिकतेतून बाहेर येऊन संवर्धनाची सर्वांगीण दृष्टी विकसित व्हायला हवी. यात प्रशासन आणि राजकीय घटकांची महत्वाची भूमिका असायला हवी.’
‘एक वाघ गेला तर त्याची मोठी बातमी होते, ती व्हायलाच पाहिजे. पण जंगलात असलेलं वाघाचं अन्न नष्ट झालं, तरीही वाघाचं आयुष्य धोक्यात येतं. आज तेच होत आहे, याकडे आपण लक्ष देणार का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आरती कुलकर्णी, डॉ. दीपक आपटे आणि मारुती चितमपल्ली यांनीही कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
‘महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. संशोधन, अभ्यास यामध्येही फारसे काम होत नाही,’ अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी ताशेरे ओढले.
‘व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांना वाघ दिसावा, यासाठी बोअरवेल खोदून रस्त्याच्या कडेला पाण्याची सोय करण्यात आली आहे. आत कुठंही पाण्याची सोय नसल्याने, वाघांना पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला यावेच लागते. हे खूपच चुकीचे असून याकडे कुणाचेही लक्ष नाही,’ असे मारुती चितमपल्ली यांनी सांगितले.
आरती कुलकर्णी म्हणाल्या, ‘पर्यावरण प्रश्नांच्या संदर्भात माध्यमांची भूमिका फार महत्वाची असते. सगळं जग या प्रश्नांवर लढण्यासाठी एक होत आहे. या काळात समस्या मांडण्याबरोबरच त्यावरची उत्तरं मांडण्यावर भर द्यायला हवा.’
‘वेगवेगळ्या कारणांमुळे सागराच्या पर्यावरण ऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे. जमिनीच्या तुलनेत सागरात वावरणे हे खूपच कठीण आहे, हे त्यातले एक महत्वाचे कारण आहे. पण पर्यावरण ऱ्हासावरचे उत्तर सागरातच आहे, हे विसरून चालणार नाही,’ असे मत डॉ. दीपक आपटे यांनी मांडले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर टॅगर्ट सीगल दिग्दर्शित ‘सीड : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट दाखविण्यात आला.